राजकीय आभास आणि प्रत्यक्षातील वास्तव
★राजकीय आभास v/s प्रत्यक्षातील वास्तव ★
काही गोष्टी दगडात खिळा ठोकून बसवावा तशा लोकांच्या डोक्यात फीट बसलेल्या असतात.त्या जागच्या हालत नाही.मग तुम्ही कितीही प्रयत्न करा.
पश्चिम महाराष्ट्रातील एक पिढी त्यांचे शरद पवारसाहेब हे जागतिक नेते आहेत,ते एक दिवस देशाचे पंतप्रधान नक्की होतील हेच मानून जगत असते,तर मुंबईतील काही एरियातील मराठी लोक हे शिवसेना नसेल तर मराठी लोक मुंबईत उपाशी राहतील ,मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून कमी होईल असे समजूनच जगत असते.या लोकांना तुम्ही कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न करा,त्या लोकांना समजत नाही किंबहुना त्यांना मुळात समजूनच घ्यायचे नसते.लॉजिक वगैरे अशा गोष्टी या लोकांना जणू माहिती नसतात.
देशाचा पंतप्रधान होण्यासाठी लोकसभेत 272 खासदार निवडून येणे आवश्यक असते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर आजतागायत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेल्या खासदारांची संख्या कधीही ९ च्या पुढे गेली नाही.तरीही पश्चिम महाराष्ट्रातील साहेबप्रेमी हे शरद पवार हे एक दिवशी भारताचे पंतप्रधान होतील हे डोक्यात एकदम फीट करून जगत असतात.
मुंबईत शिवसेनेने मुंबईतील मराठी माणसांच्या डोक्यात काही गोष्टी हेतुपुरस्सर बिंबलेल्या आहे.मुंबईत जर शिवसेना नसेल तर मुंबईतील मराठी माणूस देशोधडीला लागेल, मराठी माणसांची संख्या कमी होईल, मराठी माणूस उपाशी राहिल, मराठी माणसाला मुंबईतून हाकलून देण्यात येईल ,मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्यात येईल,अशा अनेक प्रकारच्या भीती शिवसेनेने मुंबईतील मराठी माणसाच्या मनात खूप रुजवल्या आहेत.
मुंबईतील मराठी माणसाने जर लॉजिकली विचार केला तर मराठी माणसाच्या लक्षात येईल की या सर्व भीती शिवसेना मुंबईत असताना आणि शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत गेली २५ वर्ष असताना देखील अस्तित्वात आहेत.शिवसेना मुंबईत असताना मुंबईतील मराठी माणसांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आपल्या लक्षात येईल.त्यामागील सामाजिक,आर्थिक, कौटुंबिक अशी अनेक कारणे आहेत.मुंबईत शिवसेना असूनही मराठी माणूस कधीही उद्योग धंदे किंवा व्यवसायामध्ये दिसत नाही.राहता राहिला प्रश्न मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा, जेव्हा देशात काँग्रेसची सत्ता ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत होती, तेव्हा कधी मुंबई महाराष्ट्रपासून तुटली नाही तर आता मुंबई महाराष्ट्रपासून कशी आणि कोण तोडणार ?
आणि समजा महाराष्ट्रातील एखाद्या राजकीय पक्षाने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी त्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्रातील अस्तित्व एका क्षणात संपुष्टात येईल.
वरील सर्व गोष्टींचा महाराष्ट्रातील मराठी माणसाने जर लॉजिकली विचार केला तर लक्षात येईल की महाराष्ट्रातील वस्तुस्थिती नेमकी काय आहे.